मुंबई : ‘सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात ‘लाइक्स’ मिळवण्यावरच जास्त भर असतो. प्रतिभा त्याहून अधिक फुलवण्याचे प्रयत्न फारसे होत नाहीत; या पार्श्वभूमीवर मिलिंद जोशी यांचे उदाहरण अपवादात्मक आहे. फेसबुकपासून सुरुवात करून तिथल्या ‘लाइक्स’ आणि ‘कमेंट्स’वरून पुस्तकापर्यंत पोहोचणारे ते जातिवंत कवी आहेत,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक चंद्रकांत भोंजाळ यांनी केले.
संगीतकार, गायक, चित्रकार आणि कवी असे बहुपैलू व्यक्तिमत्त्व असलेले मिलिंद जोशी यांचा ‘असंच होतं ना तुलाही’ हा कवितासंग्रह २० डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी झालेल्या सोहळ्यात प्रकाशित झाला. त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भोंजाळ बोलत होते. संपूर्ण हस्तलिखित स्वरूपात असलेले आधुनिक काळातील हे पहिले पुस्तक ठरले आहे. पुण्याच्या बुकगंगा पब्लिकेशन्सने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या कार्यक्रमात अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या हस्ते पुस्तकाचे, चंद्रकांत भोंजाळ यांच्या हस्ते ई-बुकचे, तर प्रसिद्ध लेखक, कवी वैभव जोशी यांच्या हस्ते ऑडिओ बुकचे प्रकाशन झाले. मुंबईतील विलेपार्ले येथील डहाणूकर कॉलेजच्या केशवराव घैसास सभागृहामध्ये हा कार्यक्रम झाला. या वेळी ‘बुकगंगा’च्या संचालिका सुप्रिया लिमये आणि गौरी बापट उपस्थित होत्या.
चंद्रकांत भोंजाळ म्हणाले, ‘आपल्या लेखनातून काय सांगायचे आहे, हे मिलिंदला नेमके माहिती आहे. कारण लेखनातली आशयघनता समजून घेण्याची ताकद त्याच्यात आहे. एका चांगल्या वाचकाचा पुढचा टप्पा लेखनाचा असतो आणि तो जे वाचतो, तशा प्रकारचे लिहितो. तशाच प्रकारे, मिलिंदने गाण्यांना चाली लावण्यातून कवितालेखनाचा पुढचा टप्पा गाठला. आपल्या जाणिवा, संवेदना तो शब्दांतून-काव्यातून लोकांपर्यंत प्रभावीपण पोहोचवतो. कारण तो चित्रकार, संगीतकार तर आहेच; पण कवीची उपजत दृष्टी तो घेऊन आला आहे.’
‘मिलिंद जोशी हे बहुआयामी कलाकार आहेत. त्यांची कविता डोळ्यांसमोर चित्र उभे करणारी, नाद, सूर अन् लय असणारी आहे. तसेच, त्यांची कविता साधी, सरळ, सोपी वाटणारी, पण शेवटाकडे येताना अंतर्मुख करून विचारात पाडणारी कविता आहे,’ अशा शब्दांत वैभव जोशी यांनी मिलिंद जोशी यांच्या कवितांचे कौतुक केले.
मिलिंद जोशी म्हणाले, ‘‘बुकगंगा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोगळेकर यांच्याशी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात एका कार्यक्रमात भेट झाली असताना अशा प्रकारच्या पुस्तकाबद्दल चर्चा झाली होती. आता या पुस्तकाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे.’
‘कविता किंवा शब्दांतल्या भावभावनांप्रमाणे प्रत्येक गाण्यात सूर वेगवेगळे लागतात. त्याप्रमाणे प्रत्येक पानावर कविता लिहिताना अक्षर थोडे वेगळे आहे. त्यामुळे प्रत्येक पानातून गाणे ऐकल्याचा अनुभव मिळेल. महाविद्यालयीन काळात मेव्हणे (जिजाजी) चंद्रकांत भोंजाळ स्वतः निवडक कविता लिहून पाठवायचे. तिथे माझ्यात कवितेची बीजे रुजली. अजून माझे शिकणे सुरूच आहे. आजपर्यंत अनेकांच्या कविता सादर करण्यासाठी अनेकदा मंचावर आलो आहे; मात्र स्वतःच्याच कविता सादर करण्याची ही पहिलीच वेळ आहे,’ असेही त्यांनी नमूद केले.
पुस्तक प्रकाशन सोहळ्याला टीव्ही, चित्रपट, नाट्य, गायन आणि साहित्यसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रकाशनाच्या मुख्य सोहळ्यानंतर कविता अभिवाचनाचा कार्यक्रम झाला. मुक्ता बर्वे आणि वैभव जोशी यांनी केलेल्या कवितांच्या अभिवाचनाला रसिक श्रोत्यांची भरभरून दाद मिळाली. मिलिंद जोशी आणि त्यांच्या पत्नी मनीषा जोशी यांनी केलेल्या कवितागायनाने उपस्थितांच्या हृदयाचा ठाव घेतला. त्यांना आदित्य ओक (हार्मोनियम), प्रसाद पाध्ये (तबला) आणि संजय महाडिक (गिटार) यांनी साथसंगत केली.
अस्मिता पांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन केले. त्यांनी काही कवितांचे सादरीकरणही केले.